आज
दुपारीच मला सचिन चा फेसबुकवर मेसेज आलेला, वेळ असेल तर मला बोलायचे आहे. संध्याकाळी
निवांत फोन करतो. सचिन एका नामांकित
माणसाकडे उद्योग कसा करायचा ह्याचे गेली ७/८ महिने तरी प्रशिक्षण घेत आहे. त्यात
तो ग्राहकांशी बोलणे, व्यवहार
ज्ञान, कामाची चिकाटी, कामाची निवड अश्या अनेक
मुद्द्यांवर प्रशिक्षण घेत आहे. आमची अगदी
योगायोगाने भेट झाली पण ह्या बहाद्दरांने मला लक्षात ठेवले आणि माझा संपर्क
फेसबुकवरून कायम ठेवला. दिवसभर मी माझ्या
कामाच्या नादात सचिनचे बोलणे विसरून गेलो.
बरोबर
६ वाजता फोन वाजला, अर्थातच.. सचिनचा नंबर मोबाईल मद्धे नव्हता आणि डोक्यातून
पण दुपारचा मेसेज पूर्णपणे निघून गेलेला.
मी
: नमस्कार , बाजी दराडे बोलतोय , आपण ?
तो
: सर नमस्कार , ओळखले का ? मी सचिन ... सचिन फेसबुकवरचा...
मी
: ( चपापलो आणि सहज तोंडातून खरं बाहेर
पडलं.. ) नाही ओळखले! ( कारण सचिन नाव
अनेक मित्रांचे असल्याने मला लक्षात नाही
आले. )
तो
: आपण दुपारी फेसबुकवर बोललो होतो.
मी
: अरे हो हो सचिन , बोल
कशी काय आठवण केलीस आज?
तो
: सर मला काहीतरी उद्योग करायचा आहे. मला यशस्वी व्हायचे आहे.
अशी
आमची जवळजवळ अनेक मुद्यांवर तसेच सचिनच्या परीस्थितीचा अंदाज घेत चर्चा झाली. सचिनचा
यशस्वी होण्याचा विचार नक्कीच खूप कौतुकास्पद होता पण शिक्षण कमी, नोकरी मिळणार नाही. गावी ३०/४० एकर जिरायती
जमीन, परिस्थिती आणि शिक्षण दोन्हीमुळे हतबल न होता
यशाचा काहीतरी मार्ग शोधत असलेला.
असे
अनेक सचिनसारखे होतकरू तरुण यशाच्या मार्गावर आपल्या आजूबाजूला असतात. यश म्हणजे
काय हे न कळता यशाच्या मागे धावणारे, जसं मध्यंतरी लाल सलाम नावाचा सिनेमा येऊन गेला त्यात नंदिता दास, सयाजी शिंदे सारखे दर्जेदार कलावंत होते. नक्षलवाद नेमका काय आहे आणि कसा जोपासला जातो
तसेच ह्या लढाईचा शेवट काय हे माहित नसतानाही लढणारी लोकं
आणि त्यांना मार्गदर्शन करणारी मंडळी स्वार्थाने बरबटलेली. आज मोठ्या प्रमाणात देशातील युवा रोजगार किंवा
स्वयंरोजगार मिळवण्यास धडपड करत आहे पण यश म्हणजे काय हे कुणी समजुन घेण्यास आणि
समजुन सांगण्यास पण तयार नाही.
हल्ली
यश म्हणजे खुप पैसा कमवणे, गाडी, घर, ब्रांडेड कपडे आणि चैनीच्या वस्तु हीच संकल्पना
रुजली आहे आणि ह्या संकल्पनेवर हि मंडळी यशस्वी होण्यास निघाली आहे. सध्या
३०व्या किंवा त्या आधीही अनेकांना ह्या
सर्व गोष्टी अगदी सहज हाताशी येतात मग त्यानंतर त्यांचा उत्साह आणि जीवनातील खरा
आनंद हे लोक हरवून बसतात आणि मग पुन्हा सुरुवात होते एक ध्येयहीन प्रवासाची , कधी कधी शेवट अगदी भिकेला लागणे किंवा आत्महत्यापर्यंत
होतो. अशी अनेक उदाहरणे आपल्याकडे हि
आहेत. खरेतर कालबाह्य आणि असक्षम शिक्षण पद्धती, झपाट्याने एकत्र कुटुंबपद्धतीचा होणारा ह्रास ह्यात नवीन पिढीला कुणी
सांगणारे आणि शिकवणारे राहिलेच नाही. सर्व
समाज ट्युशन मधून निर्माण होतोय ह्यातूनच उदयोजक घडवणाऱ्या कार्यशाळा आणि आयुष्यात
उद्योग न करणाऱ्या व्यक्ती लोकांना उद्योग शिकवत आहे. जसं आजन्म ब्रह्मचारी
संन्याशाने लोकांना कामसुत्र शिकवावे अशातला हा प्रकार.
हे सर्व लिहिण्यामागचा उद्देश हाच आहे कि सचिनला
उद्योग शिकवण देणारा हा हि यश म्हणजे प्रचंड पैसा आणि संपत्ती हीच शिकवण देणारा
आहे. असे अनेक सचिन उद्या विजय मल्ल्यासारखा करोडपती होईलही पण रतन टाटा सारखा माणुसकी जपणारा कुणी उद्योजक पुन्हा
ह्या ट्युशनच्या दुनियेत निर्माण होईल कि नाही इतकी शंका नक्कीच आता यायला
लागलीय. ---- बाजी दराडे
No comments:
Post a Comment